पुणे : ‘‘किंग ऑफ नट्स’ म्हणून ओळखला जाणारा बदाम म्हणजे सुक्यामेव्यातील एक बहुगुणी घटक आहे. बदामामध्ये ई जीवनसत्व, मॅग्नेशियम, डायेटरी फायबर, प्रथिने अशा एकूण १५ प्रकारच्या पोषकतत्वांचा समृद्ध साठा आहे. त्यामुळे बदाम खाणे हा निरोगी आयुष्य जगू इच्छिणाऱ्यांसाठी राजमार्ग आहे. रोज तीस ग्रॅम बदाम खाणे अत्यंत लाभदायी ठरते,’ असा सल्ला आहारतज्ञ अवंती देशपांडे यांनी दिला.
‘आलमंड बोर्ड ऑफ कॅलिफोर्निया’च्या वतीने पुण्यात हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएटच्या सहकार्याने बदामापासून पाककृती बनविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे परिक्षण अवंती देशपांडे आणि शेफ नितीन शितोळे यांनी केले.
अवंती देशपांडे म्हणाल्या, ‘बदाम खाण्यामुळे एलडीएल कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होण्यास; तसेच चांगले कॉलेस्ट्रॉल वाढण्यास मदत होते. बदामामुळे हृदयाला इजा पोहोचवणाऱ्या जळजळीचे प्रमाण कमी होण्यास मदत होते, असेही अभ्यासातून सिद्ध झाले आहे. त्यातील ई जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहते. इतकेच नाही, तर मूठभर बदाम खाल्ल्याने पोट भरते आणि पटकन भूक लागत नाही. बदामात तंतूमय पदार्थांचे प्रमाणही नैसर्गिकरित्याच भरपूर असून, साखरेचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनाही बदाम खाणे घातक ठरत नाही. कोणत्याही वयोगटातील व्यक्तींना बदाम खाणे लाभदायक ठरते. बदाम भिजवून किंवा तसेच खाल्ले तरी त्यातील पौष्टिक घटक तसेच राहतात. दिवसभरात तीस ग्रॅम म्हणजे साधारण २२ ते २३ बदाम कोणत्याही प्रकारात खाल्ले तरी त्याचा चांगला फायदा होतो. विशेषतः दुपार उलटल्यावर किंवा संध्याकाळची वेळ होत असताना, भूक लागल्यावर आपण वडा, ब्रेड, बिस्कीटे असे आरोग्यासाठी घातक पदार्थ खातो. अशावेळी बदाम खाणे अत्यंत उपयुक्त ठरते. बदामाचे कोणतेही पदार्थ उदाहरणार्थ खीर, लाडू, भाजलेले बदाम खाल्ले तरी त्याचा फायदा होतो. त्यामुळे प्रत्येकाने रोजच्या आहारात जरूर बदामाचा समावेश करावा, असे मी आवर्जून सांगेन.’
शेफ नितीन शितोळे म्हणाले, ‘आजकाल सगळेच आपापल्या तब्येतीबद्दल जागरूक झाले आहेत. त्यामुळे पौष्टिकतेची जोड असणाऱ्या नव्या पाककृतींच्या आम्ही नेहमीच शोधात असतो. बदामासारखे नट्स म्हणजे एक पौष्टिक पर्याय आहेच, शिवाय पारंपरिकदृष्ट्या त्यांना सणासुदींच्या दिवसातही मानाचे स्थान आहे. एखाद्या पदार्थाला बदामामुळे चटकन वेगळा स्वाद मिळतो. जवळ-जवळ सगळ्याच मसाल्यांच्या पदार्थांबरोबर तो मिळून मिसळून जातो. त्यामुळे कशाबरोबरही बदाम वापरता येतो.’
या वेळी अंतिम फेरीत निवडल्या गेलेल्या तीन महिलांनी बदाम हा मुख्य घटक असलेल्या खास मधल्या वेळच्या; तसेच सणासुदीसाठीच्या पाककृतींचे प्रात्यक्षिक दाखवले. त्यातून विजेत्यांची निवड करण्यात आली आणि त्यांना आकर्षक गिफ्ट हॅम्पर देऊन गौरवण्यात आले. या स्पर्धेत मधल्या वेळच्या खाण्याच्या विभागात सुप्रिया अनासने प्रथम विजेत्या ठरल्या, तर सणासुदीच्या पाककृती विभागात सोनाल चौधरी पहिल्या क्रमाकांच्या विजेत्या ठरल्या. शुभांगी निंबाळकर यांना उत्तेजनार्थ पारितोषिक देण्यात आले.